गुरुवार, ६ जून, २०१९

तू फक्त दे...

शब्द म्हणतो सुर दे
तालाला या नुर दे
सागराला तीर दे
नावेला पैलतीर दे

उडता येण्या पंख दे
चालण्यास जमिन दे
वाहता मंद वारा दे
झुळझुळता झरा दे

रोज नवे आव्हान दे
लढण्या मज बळ दे
नित्य नवी उमेद दे
साजरी ती जित दे

शुक्रवार, ३१ मे, २०१९

जन्मांतरीचे नाते

तुझ्या माझ्यातला एक धागा
नाही बांधला तो या युगा
किती जन्म झाले आजवर
तरी नाही तुला त्याची कदर
ओळखले मी जरी तुजला
गतजन्माची तू खूण विसरला
जन्मांमागून जन्म चालले
कर्माचे हे भोग ना सरले
तुटूनही ना जे अजूनी तुटले
जन्मांतरीचे नाते आपले
कितिदा नव्याने जन्मा यावे
कितिदा हे अंतर मिटवावे
समजून घेता खरं कारण
भेट ना आपली निष्कारण
उमजून घे हा धडा यातनांचा
यातूनच जातो मार्ग मोक्षाचा
पुर्वजन्माचे कर्ज संपता
कहानीची या होईल सांगता 

रविवार, २५ मार्च, २०१८

ओ वुमनिया...

नुकताच जागतिक महिला दिवस साजरा झाला. सगळीकडे कौतुक आणि अभिनंदानाचा वर्षाव चालला होता महिलांवर... त्याच वेळी या दिवसाबद्दल जोक्ससुद्धा सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले... याच गदारोळात फेसबुकवर एक विडीओ पहिला... काही महिलांनी काही प्रश्न उपस्थित करत जागतिक महिला दिवसावर बहिष्कार घालण्याचे आव्हान करत असल्याचे...

त्यांनी मांडलेले प्रश्न कितीही खरे असले तरी माझ्या मनाला मी स्वत: एक स्त्री असूनही काही भिडले नाहीत. मुळात स्त्री ही गरीब, बिचारी, अबला आहे असे जे चित्र समाजात रंगवले जाते तेच मला पटत नाही. स्त्री ही आदिशक्तीचा अंश... मग ती अबला असूच शकत नाही... पण आपल्याकडे बहुमतात जर लोकं एखादे मत प्रदशीत करत असतील तर तेच अंतिम सत्य समजले जाते... स्त्री हि सबला आहे पण ती स्वतःच स्वत:ला आणि इतर स्त्रियांना कमी लेखत राहते... मग लहानपणापासूनचे संस्कारांचे ओझे बाळगत एखादा न्यूनगंड ठेवून सर्वच महिलांना कमी लेखू लागते. यात दोष तिचाही नाही. बहुमतात त्यांच्या मनावर जे बिबंवले जाते तेच त्याचे सत्य, आचारसरणी बनते.

पूर्वीच्या काळी घरचे कामे स्त्रिया आणि बाहेरची कामे पुरुष अशी विभागणी असे. पण तेव्हाही स्त्री-पुरुष समानता होती. स्त्रिया नुसत्या चूल आणिमुल यात अडकल्या नव्हत्या. नाहीतर तुम्हीच सांगा झाशीची राणी, रझिया सुलतान, अहिल्याबाई होळकर यांना युद्धकला आणि राज्यकला अवगत असती का? पण जसजसा काळ पुढे सरकू लागला तसा कधी एका स्त्रीनेच तर कधी पुरुषी अहंकाराने स्त्रियांना पुढे जाण्यापासून अडवले. अन मग स्त्रियाच स्वत:ला कमी लेखू लागल्या. चुकीच्या पायंडे पडत असताना साधा विरोध करायला सुद्धा पुढे आल्या नाहीत. का? तर हीच रीत आहे म्हणून... जर तुम्ही स्वत:च स्वत:साठी उभे रहात नाही तर मग दुसरे तर का येतील?

काळ बदलला अन् पुरुषाच्या बरोबरीने बायकाही बाहेर पडल्या. काही संसाराचा गाडा चालवण्यासाठी तर काही कर्तुत्व, काही तर करून दाखविण्यासाठी. पण हे करत असतानाही घरातील कामे हि फक्त माझी एकटीची जबाबदारी आहे अशी भावना मनातून काही गेली नाही. आणि या भावनेतूनच आले कर्तव्य. मला नेहमीच वाटते की कुठलेही काम करताना कर्तव्याची भावना नको कारण जर तुम्ही मनापासून जर ती गोष्ट केलीत तर आणि तरच त्यात प्रेम उतरेल पण फक्त कर्तव्य म्हणून केलेत तर ते तुम्ही जबरदस्तीने कराल. आणि मग त्याला काहीच अर्थ रहात नाही. मनापासून जर करत असाल तर तुम्हाला कधीच ती कामे करायचा तणाव जाणवणार नाही. कर्तव्याने तणावात वाढच होईल.

खरे तर स्त्री-पुरुष दोघे नोकरी करत असतील तर घरातील कामे ही अतिरिक्त कामे होतात. मग ही अतिरिक्त कामेही दोघांनी वाटून घ्यावीत. तसे करणे जर शक्य होत नसेल तर मग ती कामे दुस-याकडून करून घ्यावीत. थोडे पैसे जातील पण तुमचा वेळ तुम्हाला आवडतील अश्या गोष्टी करण्यासाठी, तुमच्या माणसांना देता येईल की. उगाच ‘सुपरवूमन’ बनण्याचा अट्टाहास नको. कारण त्यामुळे तुमचे मन स्वस्थ राहणार नाही आणि त्यामुळे घरातील इतरांचेही. काही काही जणींचे स्वयंपाक करणे हा एक छंद असतो. तो केल्याने त्यांचा तणाव कमी होतो. मग करा कि बिनधास्त स्वयंपाक. आपल्या माणसाच्या चेह-यावर आपण केलेला पदार्थ खाल्यानंतर येणारे समाधान पाहणे हाही एक आनंदाचा क्षण असतोच की... थोडक्यात काय स्त्रियांनी स्वत:ला जे आवडते तेच करावे. जे आवडत नाही ते स्पष्टपणे सांगावे आणि ते न करण्याचा मार्गही शोधून काढावा. एक स्त्री आनंदी असली की मग घरही आनंदी होते. चिडचिड, वाद करण्यात स्वत:ची आणि इतरांची शक्ती फुकट घालवण्यात काय अर्थ आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्त्रिया आपल्या त्यागाचे फारच गुणगान करून लोकांची सहानुभूती मिळवत असतो. ते टाळले पाहिजे. मुळात आपण स्त्रिया भावना व्यक्त करण्यात खूपच सराईत असतो. पुरुषांचे तसे नसते. पण त्यामुळे ते काही भावनाहीन होत नाहीत. आई खस्ता खावून मोठे करते तर बाबा तुटकी चप्पल पुनःपुन्हा शिवून वापरत आपले हट्ट पुरवतात. बहिण भावासाठी कितीतरी कामे करते आणि तोच भाऊ तिच्यासाठी कधी खाऊ तर कधी स्वत:ची आवडती वस्तूही तिला देवून टाकतो. गरोदर असताना आणि नंतरही आपण बाळामुळे आपले करिअरमध्ये ब्रेक आला म्हणून हळहळतो. खरे तर बाळाला जशी आपली गरज असते तशीच आपल्यालाही विश्रांतीची गरज असते हे सोयीस्कररित्या विसरतो. स्त्री जेव्हा लहान बाळाला सोडून नोकरीस गेली की केवढा मोठा त्याग करतोय असे वाटते ना? पण समजा एखादा पुरुष नोकरीनिमित्ताने आपले घर, माणसे सोडून परदेशी जातो तेव्हा आपण काय बोलतो? व्वा काय मस्त संधी मिळाली याला नोकरीत. का? त्याला भावना नाहीत? काहीच वाटत नसेल का त्याला असे जाताना? पण तरीही घरातील लोकांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी तो जातो. हा त्याचा त्यागच नाही का? मग जर स्त्री-पुरुष दोघेही त्याग करत असतील तर मग आपणच आपल्या त्यागाचे भांडवल का करावं? तुम्हीच विचार करून ठरवा.

स्त्री-पुरुषांना देवाने काही दैवी देणग्या दिल्या आहेत ज्या एकाकडे आहेत तर दुस-याकडे नाहीत. याला एकच कारण ते असे की दोघे एकमेकांना पूरक असावेत. मग आपण हा क्षेष्ठ ही क्षेष्ठ असा वाद घालवण्यात वेळ दवडणे कितपत योग्य आहे. दोघेही आपल्याआपल्या जागी योग्यच आहेत. फरक असतो तो त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा. या संस्कारानुसारच त्यांचे वर्तन असते.

शेवटी इतकेच सांगीन ‘सुपरवुमन’ किंवा सर्वश्रेष्ठ न बनता फक्त माणूस बनून जगा. चुका, त्यातून शिका पण मुक्तपणे जगा.  उगाच perfect बनण्याचा अट्टाहास नको. Sometimes it’s perfectly okay to be imperfect.

रविवार, ४ मार्च, २०१८

हरीशचंद्रगडाच्या निमित्ताने...

हरीशचंद्रगड, गिर्यारोहकांची पंढरी... खरे तर मी trekking म्हणजे गिर्यारोहण क्षेत्रात येण्याचे एकमेव कारण... माझा पहिला ट्रेक खर तर सरसगड... पण एका दिवसाच्या त्या ट्रेकच्या छान अनुभवानंतर दोन दिवसांचा वस्तीचा ट्रेक त्याच लोकांसोबत म्हणजे गिरीविहंगसोबत करायचे ठरवलं... खरे तेव्हा मला वाटले हि नव्हते कि मी गिर्यारोहण पुढे कायम स्वरूपी करतच राहीन... साधलेघाट ते हरीशचंद्रगड असा तो ट्रेक...

आदल्यादिवशी रात्री बोरोवलीहून बस पकडली. आम्ही साधारण ३५-४० जण होतो. मस्त गप्पा, अंताक्षरी म्हणत प्रवास चालू होता... जसजशी रात्र सरत होती तसे हळूहळू सगळे झोपेच्या आधीन होऊ लागले. मला मात्र प्रवासात झोप येत नसल्याने जागी राहून बाहेरच्या अंधाराची आणि पाळणाऱ्या झाडांची मजा घेत होते.  साधारण पहाटे ४:३०- ५ च्या सुमारास आम्ही साधलेघाटात पोहचलो. बस तिथेच सोडून आम्ही अंधारातच घाट उतरायला सुरुवात केली. थोडसं अंतर चालल्यावर एक शाळा दिसली. तिथे आम्ही थांबलो चहा व नाश्ता करण्यसाठी.

नाश्ता आणि सकाळीची कामे आवरून आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. सरसगडला आलेले अमित शिंदे, अमित शिर्सेकर, राजेश जाधव, सचिन राऊत, साधना madam यांच्याशी गप्पा मारत चालणे चालू होते. पण जसजसं ऊन वाढू लागलं तसतशी माझी battery उतरायला लागली. एक तर उनाची सवय नाही, दुसरे पहिलाच वस्तीचा ट्रेक तर सामान खूप सारे घेतलेले. इतकं सामान घेवून उनात चालायचं जीवावर येत होत अगदी. त्यात झोप नव्हती झालेली त्यामुळे भर म्हणून पित्त उसळलेले. पण सांगणार कोणाला... सगळ्यांची नवीनच मैत्री झालेली... मग काय चलते राहो...  सभोवती उंच सह्याद्रीच्या रांगा... वेगवेगळ्या आकाराचे डोंगर... मध्येमध्ये निलेशदा त्यांची नावं सांगत होता खरा... पण त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा माझी कडेकपारीचे फोटो काढणे चालू होते... माझ्यासाठी हा एकदम नविन अनुभव होता... एरव्ही गाडीतून प्रवास करताना सहयाद्री पाहिलेला... चालत रमत गमत इतक्या जवळून सह्याद्रीला पाहण्याचा अनुभव काही न्याराच होता.

दुपारचे जेवण एका सावलीच्या ठिकाणी केले. ऊनाचा जोर आता वाढू लागला होता. आणि त्यामुळे माझा वेग ही कमी होऊ लागला. सामान घेवून चालणे मला जमत नाही हे अमित शिंदेच्या लक्षात आले. त्याने माझे थोडे सामान त्याच्याकडे घेतले. पण हे ऊन... त्याचे काय... पहाटेपासून चालतोय या डोंगररंगातून आणि अजून किती चालायचे ते हि ठावूक नाहीये... का हि लोक इतकी पायपीट करतात असा विचार सारखा मनात येत होता.

मजल दर मजल करून आम्ही शेवटीसवा दुपारी ४ ला पाचनई गावात पोहचलो. तिथे भगवानदादाने आमचे स्वागत केले. छान शेणाने सावरलेले घर. . हुश चला आलो एकदाचे मुकामाच्या ठिकाणी. पण बंटीने सांगितलं कि इथे चहा घेवून गडावर जायचे आहे. आजचा मुक्काम गडावर आहे. माझे तर त्राणच गेले ऐकून. मी विचारले “अजून किती चालावे लागेल?” माझा अवतार पाहून सचिनने म्हटले “फक्त अर्धा तास अजून”

चहा घेतला अन मग मला उलट्या होऊ लागल्या. जागरण, पित्त आणि ऊनाचा त्रास एकदम बाहेर पडले. पण मला थोडे बरे वाटू लागलं. एव्हाना ऊनही कमी झाले होते. आम्ही गडावर जाण्यास सुरुवात केली. थंड हवा असल्याने गड चढण्यास तितकासा त्रास झाला नव्हता. गडावर पोहचायला साधारण ६ वाजले असावेत. आम्ही गणेश गुहेत सामान टाकले आणि धावत कोकणकड्याकडे निघालो...

मला कळत नव्हते कि सगळे इतकी घाई का करत आहेत ते. साधना madam म्हणाल्या “ ते तुला कड्यावर गेल्यावर कळेल”. आम्ही कोकण कड्यावर पोहचलो अन मी स्तब्धच झाले. सूर्यास्त होत होता.

सुर्याची सोनेरी किरणे डोंगरांवर पडून डोंगर सोनेरी झाले होते. एका कड्याला गणपतीमुखाचा आकार तर इतका विलोभनीय दिसत होता कि मी फक्त पाहतच राहोले. सोनेरी आकाश आणि त्यात रक्तवर्णीय गोल.

मग हळूहळू आकाश रंग बदलू लागलं. आधीचा सोनेरी रंग जावून निळाई आणि लाल रंगाच्या छटा येवू लागल्या. अवघ्या १५ मिनिटात निसर्ग आपले रंग बदलत होता. तिथे असलेले सगळे तल्लीन झाले होते ते सगळ पाहण्यात. आणि मला सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. इतकी पायपीट करून काय मिळणार? दिवसभराचा थकवा कधीच पळून गेला होता. मी तर प्रेगात पडले त्या सगळ्याच वातावरणाला. असा निसर्ग पहायचा तर सहयाद्री तुला मी नेहमीच भेटायला येईन असा निर्धारच केला मी तेव्हा.

एव्हाना अंधार पडू लागला होता. आमची पाउले आता गुहेकडे वळली मनात अभूतपूर्व असा अनुभव घेवून. कोकणकड्याचे ते रूप आजही माझ्या मनातून जात नाही. रात्री इतर सगळे गप्पा मारत बसले पण मी मात्र लवकर झोपले. सकाळी उठल्यावर केदारेश्वराचे दर्शन घेवून तारामती आणि रोहिदासला भेटून आलो.

नंतर सुरु केला परतीचा प्रवास मनात अनेक आठवणी घेवून. खूप सारे शिकले मी या दोन दिवसात. इच्छाशक्ती असेल तर सगळे करता येते. स्पर्धा नेहमी स्वत:शी करावी. निसर्गाशिवाय दुसरा मोठा कलाकार नाही. आणि महत्त्वाचे ट्रेक करताना फक्त गरजेचे सामान घ्यायचे.


त्याच आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि जवळजवळ १० वर्षांनी पुन्हा हरिश्चंद्रगडाला भेटायला जायचं ठरवलं. जणू गडही मला बोलवत होता. मी, आफरीन, समरीन, राजीव आणि अमेय असा पाच जणांचा प्लान केला. शेवटची कसारा लोकल पकडली. तिथे एका जीपवाला आधीच सांगितला होता. लोकल पोहचताच जीपमध्ये बसून पाचनई गाठले. गावात बराच बदल झालेला दिसला. जीपवाल्या काकांनी भगवानच्या घरी सोडलं. त्याचा घरी थोड्या वेळ झोप काढली. सकाळी नाश्ता करून ७:३० ला गडाकडे कूच केली. मन मात्र भगवान दादाच घराची खुण शोधात होते. शेवटी न राहवून एका आजीला भगवानदादाच्या घराचा पत्ता विचारला. भगवानदादाला भेटल्यावर त्याने लगेच ओळखले. तो चहाचा आग्रह करू लागला. त्याला येताना येतो सांगून पुढे निघालो.

साधारण दोन-अडीच तास चालल्यावर गडावर ११:३० ला पोहचलो. गडाचे रूप बदलेले दिसल. गडावर अनेक छोटी बाजारपेठ तयार झालेली दिसली. आणि आधी न पाहिलेला प्लास्टिककचराही. मन थोडं हळहळल. तुकाराम दादाकडे चहा घेतला आणि रात्रीच्या जेवणाबद्दल सांगितलं. नंतर गणेशगुहा गाठली. सगळेच थकले होते. म्हणून थोडा वेळ झोप काढून कोकणकड्यावर जायचे ठरवलं. मी आणि अमेय सोडून सगळे घोरू लागले. १:३० वाजता सगळ्यांना उठवलं. झोप झाल्याने सगळे ताजेतवाने झाले होते. अमेयच्या आईने छान जेवण दिले होते. त्यावर ताव मारला.

२:३० वाजले होते आणि कोकणकड्यावर ऊन असेल म्हणून तारामती आणि रोहिदास करून शिडीवाटेने कोकणकड्यावर जायचे ठरले. तारामतीला जाताना एक कुत्रा आमच्यासोबत आला. तो आमचा वाटाड्या झाला. अमेय त्याच्या मागे चालू लागला. कुत्रा मळलेली वाट सोडून कारवीच्या रानात शिरला. तसा मी अमेयला म्हटलं “अरे हि वाट नाही वाटत मला”. अमेय म्हणाला “अरे ये कुत्ता रोज आता है! उसे ज्यादा पता होगा ना. इसे ही follow करते है|” मग काय शिरलो कारवीच्या रानांत.

थोडा पुढे गेल्यावर सगळ्यांच्या लक्षात आले की आपण चुकीची वाट घेतलीय. पण आता काहीही पर्याय नव्हता. कधी climb करत तर कधी करवीशी झुंजत शेवटी तारामती सर केलाच. तारामती climb करणारे कदाचित आम्ही पहिलेच असावोत. तिथे छान फोटो काढून आम्ही आमचा मोर्चा रोहीदासाकडे वळविला. एव्ह्याना ४ वाजायला आले होते. रोहिदासच्या पाठराच्या कडेला कोकणकड्यावर जायला शिडी होती. पहिली शिडी बरोबर घेतली. ती उतल्यावर खुणां बघून रस्ता शोधू लागलो. आम्हाला दोन शिड्या आहेत हे माहित नव्हता. दुस-या शिडीच्या जवळ गेलो होतो. पण ती पाहता उजवीकडे वळलो. वाटले कि या छोटेखानी जंगलातून वाट असावी. आमच्यासोबत अजून एक पाच जणांचा गटही वाट भरकटला. दीड-दोन तास आम्ही जंगलात रस्ता शोधत भटकत होतो. आमच्या जवळचे पाणी संपले होते आणि दोन तासात पोहचणार म्हणून खाण्यासाठी काहीच नाही घेतलेले सोबत. ५:३० वाजले तसा माझा जीव कोकणकड्यासाठी तुटू लागला. वाट काही केल्या सापडत नव्हती. शेवटी पहिल्या शिडीजवळ जावून पुन्हा सरुवात करायचे ठरवले. शिडीजवळ पोहचलो तर अजून एक trekkersचा गट आला. त्यांनी सांगितलं की अजून एक शिडी आहे ती उतरली कोकणकड्यावर जाता येते. आम्ही त्याच्या मागे शिडी उतरून कोकणकड्याकडे निघालो.

कोकणकडावर पोहचताच माझ्या तोंडावर नकळत हसू आले. रस्ता हरवल्यावर आलेला ताण कुठच्या कुठे पळून गेला होता. कडाही मला विचारत होता “काय ग इतकी वर्षे लावलीस परत भेटायला?” कड्याची मनातल्या मनात क्षमा मागितली आणि वचन दिले “वर्षातून एकदा तरी येईन तुला भेटायला”. तोच कडा, तोच सूर्य आणि तेच रंगीबेरंगी आकाश... मनच भरत नव्हता...

अंधार पडू लागला तसा गुहेकडे वळलो. रात्रीचं जेवण करून, मस्त कॅम्प फायरचा कार्यक्रम केला. सकाळी केदारश्वर दर्शन करून परतीचा मार्ग धरला.

गड उतरल्यावर भगवानदादाकडे चहा घेत जुन्या आठवणी जाग्या केल्या. मग गडाच्या दिशेने सलाम करत लवकरच भेटू असे म्हणत हात हलवला...

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

तू...

ध्यानीमनी नसतानाही
आयुष्यात आलास तू

नकळतपणे अगदी
जवळचा झालास तू

दुख-या मनावर हळूच
फुंकर घातलीस तू

डोळयांतल्या भावनांना
सराईतपणे वाचलेस तू

एका फुलापरी मजला
अलगद जपलेस तू

माझ्यातल्या खोडकरपणाला
बाहेर काढलेस तू

कौतुकाने माझ्या अल्लडतेला
दाद दिलीस तू

माझ्या चूकांनाही मोठेपणाने
माफ केलेस तू

माझा प्रत्येक हट्टही
पुरवलास तू

कळलेच नाही कधी
श्वास झालास तू

सांग कसे जगणार जर
सोबत नसशील तू

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

झेप...

हरवले ते पुन्हा गवसले
गवसले ते नव्याने जाणवले

असेल का ते मोठं वादळ
कि सुखाची ती चाहूल

मार्गात असती अडचणीं कैक
पार करुयात एकामागून एक

हरवल्या होत्या आधी दिशा
शोधायची त्यांना चढली नशा

पंख झाले होते अति दुर्बळ
विश्वासाने त्यांना आलंय बळ

ठरलं सगळं अजाणता
हसू आलं आज ते कळता

धेय्य आहे फारच कठिण
पण मिळविण्या मी झटीन

कदाचित पडेन मी झडेन मी
तरीही जिद्दीने लढेन मी

आता नाही हरण्याची ही खेप
कारण घेतली जिंकण्या मी झेप...

रविवार, १४ जानेवारी, २०१८

बाप हा बापच असतो जगाच्या पाठीवर कुठेही...

नेहमी आपण आईचे कौतुकाचे लेख कविता वाचतो... पण बाबांबद्दल फारच कमी लिहिलेले वाचतो... मी माझ्या पप्पांची तर लाडकी होतेच... हा लेख माझ्या पप्पांबद्दल लिहिण्यासाठी नाही तर माझ्या स्पानिश बाबाबद्दलचा आहे.

 काही वर्षांपूर्वी मला ऑफिसच्या कामानिमित्ताने स्पेनला जावे लागले होते. परका देश, त्यात तिथले लोक स्पॅनिश व्यतिरिक्त कुठलीही भाषा न बोलणारे... आणि मी पूर्णतः शाकाहारी... म्हणून ठरवलं की स्वयंपाकघर असलेलाच घर भाड्याने घ्यायचे... तसे मी घेतलेही... पण ऑफिस ते घर हे अंतर फार होते... मग ठरविले कि पहिला आठवडा तिथे टॅक्सीने करायचा आणि नंतर मग ट्रेन किवा बसने...
पहिल्या दिवशी टॅक्सीने कार्यालयात पोहचले. रिसेप्शनला कुणीतरी आत घेवून जाण्यासाठी वाट पाहत होते. इतक्यात एक साधारणतः ४० -४५ वर्षाचा गृहस्थ तिथे माझा नाव घेत आला. “हेलो, मी विक्टर, तुझ्या प्रोजेक्टचा मँनेजर” अशी स्वतःची हसत ओळख करून दिली होती. सगळ्या औपचारिकता पूर्ण करून आम्ही आत गेलो.

मी थोडे वेळेच्या आधी गेले होते म्हणून इतर येईपर्यत आम्ही वाट पाहायचे ठरवले. तोवर आम्हा दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. गप्पाच्या ओघात कळले कि या कार्यालयात फक्त विक्टरला इंलीश येत असल्याने हे प्रोजेक्ट त्याला देण्यात आले होते. त्याने मला विचारले कि मी कुठे राहणार आहे. मी माझ्या हॉटेलचा पत्ता सांगताच त्याने विचारलें “तू इतक्या लांब का हॉटेल घेतलेस? तूला रोज प्रवास करणे कठीण जाईल...” मी त्याला माझी जेवणाची अडचण सांगितली. इथे जवळपास कुठलेही हॉटेल स्वयंपाकघरसह मिळत नसल्याने नाईलाजाने दूर राहावे लागणार हे सांगितले. हे ऐकताच तो मला लगेच म्हणाला “काही काळजी करू नकोस मी तुला आजपासून रोज माझ्या कारने सोडीन.” मला वाटले “चला याचे घर माझ्या हॉटेलच्या जवळपास असेल म्हणून हा असे म्हणत असेल. माझ्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे”

पहिल्या दिवशी विक्टरने मला हॉटेलला सोडले आणि तो निघून गेला. दुस-या दिवशी सकाळी बरोबर ८ वाजता मला नेण्यासाठी हजर होता. आम्ही निघालो ऑफिससाठी... तेव्हा त्याने मला सांगितला कि त्याला त्याच्या एका मैत्रिणीलाही मध्ये घ्यायचे आहे. ती आमच्याच कार्यालयात काम करते आणि त्याच्या घराजवळच राहते... आम्ही तिला घेतले नि ऑफिसला गेलो. संध्याकाळी घरी जाताना त्याने आधी घरी सोडले अन मग मला हॉटेलवर... त्याचे घरापासून माझे हॉटेल जवळ जवळ एक तास पुढे आहे हे मला तेव्हा कळले. माझा हॉटेल आणि ऑफिस हे त्याच्या घरापासून एकदम विरुद्ध दिशेला होते. आणि तरी हा माणूस सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास जास्तीचा प्रवास करत होता माझ्यासाठी. त्याला मी म्हटले हि कि मी करेन टॅक्सी, ट्रेन किवा बसने प्रवास. पण हा काही ऐकायलाच तयार नाही. “मला काहीच त्रास होत नाही.  उलट तुलाच प्रवासाचा त्रास होईल जर तू माझे ऐकले नाहीस तर” असं म्हणून विक्टरने हा विषय तिथेच संपवला. 
कधी कधी ऑफिसमधून आम्ही जेवायला बाहेर जायचो. माझी सगळ्यात मोठी अडचण असायची कि आता काय खायचं आणि कसे मागवायचे... कारण स्पेन मध्ये इंग्लिश बोलणारा भेटण हि एक मोठे दिव्यच जणू. त्यात युरोपियन देशांत शाकाहारी जेवणाचे अर्थही आपल्या भारतापेक्षा वेगळे. भारतात अंडी, मासे, मांस हे झाले मांसाहारी पदार्थ. तर युरोपियन देशांत अंडी, मासे आणि काही काही ठिकाणी चिकनखिमा हे शाकाहारी पदार्थात गणले जातात. पण अशा वेळी विक्टरच मदत करायचा कितीतरी स्पानिश शुद्ध शाकाहारी पदार्थ त्याने खाऊ घालायचा.

 सुट्टीच्या दिवशी कुठे कुठे फिरायला जायचे हे मला बऱ्याचदा विक्टर सुचवायचा. मग मी माझ्या सुट्टीचे तसाच आयोजन करायचे. खूप सुंदर सुंदर ठिकाणं पहिली मी स्पेन मध्ये. सोल हे स्पेनमधले मध्यवर्ती ठिकाण. स्पेनच्या कुठल्याही सीमेपासून या ठिकाणचे अंतर सारखेच आहे.
 स्वतःच्या हाताने केलेला स्वयंपाक खाऊन कधी कधी कंटाळा आला कि अस्सल भारतीय जेवण खावेसे वाटायचे. आणि मग एक ठिकाण शोधून काढले जिथे भारतीय आणि पाकिस्तानी हॉटेल होते. एका शनिवारी मी त्या ठिकाणी जावूनही आले. सोमवारी मी जेव्हा विक्टरला हे सांगितले. तर मोठ्या काळजीच्या स्वरात तो म्हणाला “पुन्हा त्या ठिकाणी जावू नकोस. ते ठिकाण तुझ्यासाठी सुरुक्षित नाही. मी तुला दुसऱ्या ठिकाणचा पत्ता देतो तिथे जात जा भारतीय खाण्यासाठी.”

आमच्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. विक्टरला दोन मुली होत्या एक १५ वर्षाची आणि एक ४ वर्षाची. आणि म्हणूनच तो माझ्या बाबतीत जास्त संरक्षणात्मक असावा. कारण माझा एक सहकारी नेदरलंडहून आला होता. पण त्याच्याशी याचे वागण अगदीच औपचारिक होते. या गप्पामध्ये त्याने एकदा मला सांगितलं कि त्याच्या मोठ्या मुलीचा एक मित्र आहे, पण त्याला तो तिचा प्रियकर असावा असा संशय आहे. तो मुलगा त्याला अजिबात आवडत नव्हता कारण त्याचे वागणे हिप्पी सारखं होते. त्याला मुलीचा प्रियकर असणे ह्या बद्दल काळजी नव्हती कारण स्पेनच्या संस्कृतीमध्ये हि एक साधारण गोष्ट होती. पण त्याची काळजी होती तो योग्य मुलगा नाही याची. जी एका भारतीय बापाची आपल्या मुलीच्या बाबतीत असते अगदी तशीच. आपली मुलीने योग्य जोडीदार निवडावा अन ती सुखात राहावी हीच माफक इच्छा. मोठ्या मुलीसाठी काळजी जितकी योग्य होती तितकाच लहान मुलीसाठीही. छोट्या मुलीला शिकवण्यासाठी त्याने माझ्याकडून मुळाक्षरे लिहून घेतली होती. अन मला जाणवलं कि बाबा हा बाबा कुठेही सारखाच असतो आपल्या पिल्लांसाठी.

असे बरेच प्रसंग आठवतात. पण सगळ्यात मनात घर करून गेलेला प्रसंग कि ज्या नंतर मी सुद्धा त्याला माझा स्पानिश बाबा समजायला लागले...
एकदा रात्री सोलमध्ये प्रोजेक्टच्या टीमची मेजवानी ठेवली होती. जेवण वैगेरे संपवून साधारण रात्रीचे ११ ११:३० वाजले होते. काहीजण आपल्या गाडीने तर काही टॅक्सीने घरी जावयास निघाले. मीही टॅक्सीने जाण्याच्या तयारीत होते. विक्टर माझ्याकडे आला नि म्हणाला “चल मी तुला घरी सोडतो”. मी म्हटलं कि “मी जाईन टॅक्सीने तुला उशीर होईल घरी जायला”. तर चटकन तो म्हणाला “ज्योती, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. तुझी सुरक्षितता मला माझ्या देशात खूप महत्वाची आहे. चल आता खूप उशीर झालाय मी तुला सोडतो.”

या त्याच्या वाक्याने मलाही थोडं भरून आले होते. नाहीतर परक्या देशातल्या एका मुलीसाठी कोण इतकी आपुलकी दाखवते... खरच काही नाती मनाने जोडली जातात अन ती रक्ताच्या नात्याइतकीच अतूट राहतात...